किवळे : गेल्या तीन दिवसांपासून पवन मावळात होत असलेल्या जोरदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रविवारी दुपारपासून गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणाऱ्या साकव पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी व कामगार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असल्याने रविवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या शेतकरी व कामगारांना नऊ-दहा किलोमीटरचा वळसा घालून घरी जावे लागले. साकव पूल पाण्याखाली गेल्याने सोमवारपासून गहुंजे, मामुर्डी , रावेत, देहूरोड, किवळे , विकासनगर आदी भागांतील विद्यार्थ्यांना साळुंब्रेतील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात येण्या-जाण्यासाठी सोमाटणे फाटामार्गे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. साळुंब्रे गावातून देहूरोड, पिंपरी -चिंचवड परिसरात शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, तसेच पिंपरी , भोसरी व चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, देहूरोड , पिंपरी , चिंचवड व आकुर्डी भाजी मंडई येथे तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, रावेत व विकासनगर येथे दूध घेऊन येणारे दूध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालून ये - जा करावी लागणार आहे. (वार्ताहर) >उंच पुलाअभावी होतेय गैरसोय दर वर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र, शासन उदासीन असल्याची तक्रार . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक त्रस्त . पावसाळ्याचे तीन-चार महिने जिकिरीचे , शेतीमाल व दूध व्यवसायात मोठे नुकसान . कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची कामगारवर्गाची मागणी .
गहुंजे-साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली
By admin | Updated: July 4, 2016 02:09 IST