मलकापूर : येथील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम पंत यांचे वृध्दापकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी २७ मे रोजी रात्री अमळनेर येथे निधन झाले. त्यांच्यावर आज २८ मे रोजी सायंकाळी अमळनेर येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मलकापूर येथील मूळ रहिवासी असलेले पुरुषोत्तम पंत यांनी स्वातंत्र्य चळवळीत विविध भूमिका निभावल्या. दहाव्या वर्गात शिक्षण सुरु असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. त्यांचा गोवा छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग होता. या आंदोलनासाठी गेले असता त्यांना पोतरुगीजांनी बेदम मारहाण करुन जेलमध्ये टाकले व त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहीया, जयप्रकाशजी नारायण, अशोक मेहता यांचेसोबतच मलकापूर येथे आणून सोडले होते. सार्वजनिक ठिकाणी सुंदर अक्षरात बोर्ड लावून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी ते सतत झटले. लहान मुलांत व तरुणांत स्वच्छतेची गोडी, व्यायामाची गोडी निर्माण होण्यासाठी ते सतत प्रयत्नशिल असत. इंग्रज शिपाई त्यांच्या मागावार असायचे. त्यामुळे ते स्वत:च्या घरी एक-दोन महिन्यातून एखाद्यावेळी भेटीसाठी येत व निघून जात, मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही. या प्रांतातून त्या प्रांतात असे पूर्ण भारतभर भ्रमण करीत. त्यांचे संघटन पक्के, मित्र जिवाला जीव देणारे होते. इंग्रजी, हिंदी, उर्दू, मराठी व गुजराती याचा चांगला अभ्यास असल्याने परिचय दांडगा होता. सगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, सामाजिक संघटना आदींशी चांगला परिचय होता. मुलांवर सामाजिक, सांस्कृतिक संस्कार घडविण्यासाठी विशेष भर दिला. त्यांचे जीवन नेहमी संघर्षमय राहिले. वैयक्तीक प्रसिध्दीच्या विरोधाचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या नावाचा लावलेला चौकातला दगड, स्मृतीस्मारक त्यांनी स्वत: तोडला व मला प्रसिध्दी नको असे सांगितले. मदनलालजी धिंग्रा यांची लालसेना (नागपूर) यामध्ये ते सामील झाले होते व त्यांच्या निर्देशानुसार काम करीत असत. स्वतंत्र सैनिकांचा सन्मान करण्यासाठी नायब तहसिलदार आर.जे.सिरसाट, सतीश पाटील व ताडे, ठाणेदार काझी इत्यादी अधिकार्यांनी पुष्पहार अर्पण केले.
स्वातंत्र्य सैनिक पुरुषोत्तम पंत कालवश
By admin | Updated: May 29, 2014 00:49 IST