पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला खरा; पण राज्यातील सुमारे १४ लाख शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ तर दुष्काळग्रस्तांसाठीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी विविध कारणांनी शासनाकडे परत गेला आहे़ एकाच सातबारावर अनेकांची नावे असणे, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न मिळणे आदी मदत मिळण्यात अडथळे ठरल्याची कारणे पुढे केली जात आहेत़ बँक खात्याचा आग्रह न धरता लाभार्थी शेतकऱ्यांच्या हातावर थेट मदत टेकवता आली असती़, पण सरकारी यंत्रणेने परिपत्रकातील परिभाषेनुसार ‘कर्तव्य’ पार पाडले़ दुष्काळग्रस्तांना मदत दिल्याची घोषणा करून सरकारने ढोल पिटले, पण लाखो शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोचलीच नाही़ मदत निधीच्या वाटपातील ‘दुष्काळ’ संपणार कधी, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातील दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोचली आणि शासनाचा उद्देश सफल झाला का याचा घेतलेला हा धांडोळा़..
चौदा लाख शेतकरी वंचित
By admin | Updated: March 30, 2015 02:19 IST