गडचिरोली, वर्धा, भंडाऱ्यातील घटना : शिक्षण संस्था महिला सचिवाला न्यायालयात अटकगडचिरोली/वर्धा/भंडारा : गडचिरोली तालुक्यातील नवेगाव मुरखळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात टेंभा येथील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्षासह ग्रामसेविका आणि भंडारा येथे न्यायालय परिसरातच शिक्षण संस्थेच्या महिला सचिवाला गुरूवारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. चारही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यात नवेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात शाळा सोडल्याचा दाखला मिळविण्यासाठी मिथून रणजित मुजूमदार रा. नवेगाव मुरखळा यांनी अर्ज केला होता. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका कविता सदाशिव दोनाडकर (५७) यांनी ५०० रूपयाची लाच मागितली. या संदर्भात मुजूमदार यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज दुपारी सापळा रचून मुख्याध्यापिका कविता दोनाडकर यांना महात्मा गांधी विद्यालयाच्या कार्यालयात सायंकाळी ४.२० वाजता ५०० रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूध्द गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात टेंभा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ योजनेच्या टाकीच्या बांधकामाचे ३६ लाखांचे कंत्राट नागपूर येथील अरविंद चेंदनखेडे यांना मिळाले. त्यांनी हे काम नत्थूजी तेलरांधे रा. बेलतरोडी जि. नागपूर या कंत्राटदाराच्यामार्फत करुन घेतले. तेलरांधे यांनी १७ लाख ८२ हजार रुपयांचे बांधकाम पूर्ण झाले. मोबदल्यात तेलरांधे या कंत्राटदाराला १४ लाख ४० हजार रुपयांचे देयक देण्यात आले. उर्वरित देयके काढून देण्यासाठी ग्रामसेविका वनीता राठोड आणि पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष धनराज घराडे यांनी एकूण बांधकाम किमतीच्या तीन टक्के म्हणजेच ३१ हजार रुपये लाचेच्या स्वरुपात मागितले. तेलरांधे यांनी ३० हजार देण्याचे मान्य केले. मात्र लाच द्यायची नसल्याने तेलरांधे यांनी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ग्रामसेविकेच्या हिंगणघाट येथील निवासस्थानी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने करण्यात आली यात पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर, प्रदीप देशमुख, गिरीष कोरडे, प्रदीप कदम, माणिक गोडे, रागिणी हिवाळे, सागर सांगोडे, राजेंद्र बुरबुरे, संजय डगवार यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.खमारी बुटी येथील राजू फत्तू बोरकर यांचा मुलगा विजय हा कस्तुरबा गांधी विद्यालय बेलगाव येथील बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. सन २०१२-१३ मध्ये तो दोनवेळा अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याला बारावीत पुन:प्रवेश मिळावा, याकरिता राजू बोरकर यांनी शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय कारधा येथे प्रयत्न केला. मात्र प्राचार्य हलमारे यांनी प्रवेश प्रक्रिया बंद झाली असून अॅडमिशन होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर सदर महाविद्यालयाच्या संस्थेचे सचिव नलिनी विष्णू काळे यांनी मुलाची अॅडमिशन करून देण्याचे अभिवचन दिले. बोरकर यांच्याकडून विद्यार्थ्याचे कागदपत्रे घेतली व यानंतर त्यांना पाच हजार रुपयाची मागणी केली. हलाखीची परिस्थिती असल्याने बोरकर यांनी पाच हजार रुपये देण्याऐवजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे काळे यांची तक्रार केली. पाच हजारांऐवजी चार हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. दरम्यान भंडारा न्यायालय परिसरात लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काळे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त वसंत शिरभाते, पोलीस अधीक्षक मानकर, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, सहाय्यक फौजदार हेमंत उपाध्ये, पोलीस हवालदार उके, नापोका अशोक लुलेकर, भाऊराव वाडीभस्मे, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, लोकेश वासनिक, रसिका कंगाले, मनोज चव्हाण आदींनी केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)
मुख्याध्यापिकेसह चार लाचखोरांना अटक
By admin | Updated: July 18, 2014 00:57 IST