अकोला : राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, शंभर टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकर्यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपुरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी कृषीमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात खडसे म्हणाले, शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकर्यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहेत. शेतकर्यांनी शेतीपुरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृध्दींगत करण्यावर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले. * शेतीसाठी उपाययोजनाशेतकर्यांना ४0 शेळ्या आणि दोन बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकर्यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सुक्ष्म, सरंक्षित सिंचनासाठी शेततळ्य़ांची योजना नव्याने राबविण्यात येतील. याकरीता २0 लाखाचे अनुदान शेतकर्यांना दिले जाणार आहे. शेततळ्य़ातून पाणी घेण्यासाठी सौरउज्रेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१0 लाखाचे अनुदान दिले जाईल. सुक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसात हे अनुदान त्यांना मिळेल. शेतीसंबधी हजारो प्रलंबीत तक्रारीचा निपटारा करण्यासाठी राज्यात छोटी न्यायालये स्थापन्याचे प्रयत्न सुरू असून, जिथे शेत तिथे खडीकरणाचा रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माती परिक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकर्यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
शेतक-यांच्या आत्महत्यांवर उपाय सापडेना!
By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST