कारंजा(वाशिम): मुलीच्या छेडखानीवरून दोन गटात झालेल्या मारहाणीच्या पृष्ठभूमिवर कारंजा येथे दोन दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये गुरूवारी दोन तासांची शिथीलता देण्यात आली. दरम्यान, मारहाण प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरूच असून, बुधवारी रात्री पोलीसांनी आणखी आठ जणांना अटक केली. एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून कारंजा येथे मंगळवारी दोन गटामध्ये मारहाण होऊन तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाच्या मारहाणीमध्ये एका युवकाचा मृत्यूही झाला होता. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल करून, चौघांना अटक केली. मारहाण प्रकरणी पोलीसांनी ४४ जणांवर गुन्हे दाखल केले असून बुधवारी आणखी आठ जणांना अटक करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन दिवसांपासून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. बाजारपेठ बंद असल्याने कारंजावासियांचे बेहाल झाले. जीवनावश्यक वस्तूंसाठी मारामार झाली. त्यामुळे गुरूवारी दुपारी ४ ते ६ यावेळेत संचारबंदी शिथील करण्यात आली.
कारंजात संचारबंदी शिथील
By admin | Updated: July 17, 2015 01:48 IST