मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेची प्रचंड भाडेवाढ आणि मालवाहतूक भाडे वाढविल्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसेल, अशी धास्ती भाजपा-शिवसेना महायुतीला वाटत आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांत मोदी सरकारने जर भाडेवाढीसारखे आणखी अप्रिय निर्णय घेतले, तर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी भीती महायुतीचे नेते खासगीत व्यक्त करीत आहेत.
भाडेवाढीसारख्या निर्णयाचे समर्थन करताना आमची कसरत होईल, असे भाजपाच्या एका नेत्याने मान्य केले. शिवसेनेने तर या भाडेवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले की, रेल्वे भाडेवाढीचा हा अपघात टळला असता तर बरे झाले असते. या अपघातात लाखो प्रवासी चिरडले गेले.
मोदी आले म्हणजे ‘अच्छे दिन’ येणार हा विश्वास असलेल्या लोकांसाठी भाडेवाढीचा हा धक्का पचविणो कठीण आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलीही भाडेवाढ ही दु:खदच असते. ही भाडेवाढ आधीच्या यूपीए सरकारनेच करून ठेवली होती. रेल्वेचा दर्जा आणि सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी भाडेवाढ करावी लागली आहे. (विशेष प्रतिनिधी)
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीविरुद्ध सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार, येत्या सोमवारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते मुंबई सीएसटी ते ठाणो स्थानकादरम्यान विनातिकीट प्रवास करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पत्र परिषदेत सांगितले की, सरकारने भाडेवाढ मागे घेतली नाही, तर 25 जून रोजी राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर निदर्शने करण्यात येतील. प्रवासी आणि नागरिकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली जाईल. सह्यांचे निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.