नाशिक जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी मदत घेण्यास नकार दिला आहे़ अनेक शेतजमिनींवर एकत्रित कुटुंबाचा हक्क असल्याने कोणाच्या बॅँक खात्यावर शासनाची मदत वर्ग करायची, असा कळीचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून जवळपास पाच-सहा टक्के शेतकऱ्यांनी बॅँक खात्याची माहिती दिलेली नाही, तर सुमारे चार टक्के शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे़ नाशिकमध्ये शासनाने दिलेल्या ३०० कोटी रुपयांपैकी ९५ टक्के रक्कम वाटप करण्यात आली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी ही मदत घेण्याकडे पाठ फिरवली़ नाशिक जिल्ह्यातील १३२५ गावांमधील खरीप हंगाम वाया गेल्याने शासनाने ३०१ कोटी रुपये मदत जाहीर केली होती. साधारणत: ४ लाख ८७ हजार ८८६ शेतकऱ्यांना ही मदत ३१ डिसेंबरपूर्वी वाटप करण्याचे बंधन आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे, त्यांच्या क्षेत्राची नोंद घेणे, जिल्हा बॅँकेकडे याद्या देऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा करणे, अशी संपूर्ण तयारी महसूल यंत्रणेने केली असली तरी अद्याप जवळपास एक लाख शेतकरी मदत घेण्यासाठी पुढे आलेले नाहीत. पात्र शेतकऱ्यांची संख्या व प्रत्यक्ष हवी असलेली रक्कम पाहता २८६ कोटी रुपयांची निकड पुरेशी होतीे, तर २७३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र ५ टक्के शेतकरी मदतीसाठी पुढेच येत नसल्याने सुमारे १० कोटी रुपये प्रशासनाकडे पडून आहेत.
नाशिकमध्ये दुष्काळी मदत घेण्यास नकार
By admin | Updated: March 30, 2015 02:14 IST