समीर देशपांडेकोल्हापूर : यापुढील काळात पाळीव कुत्रे, मांजर यांच्यावरही अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नगर विकास विभागाने याबाबत शुक्रवारी शासन आदेश काढले असून, प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर अनेकदा प्राण्यांचे मृतदेह खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याची डबकी किंवा रस्त्यावर फेकले जातात. मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी सुटते. त्याचा त्रास होतो. रोगराई पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे या आदेशात नमूद केले आहे.
काय आहेत सूचना? मृत प्राण्यांचे अंत्यविधी करताना दुर्गंधी येणार नाही, रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरावीक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी परवानगी द्यावी.