मुंबई : राज्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्या बरखास्त करण्यात येतील, तसेच राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबतचा अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित पेयजल योजनांच्या कामाबाबतचा आमदार किशोर पाटील, संजय सावकारे, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, गुलाबराव पाटील, मधुकर चव्हाण, शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. फडणवीस म्हणाले की पाणीपुरवठा योजनांमध्ये ग्राम समित्यांना अधिकार दिल्याने याबाबत अनेक त्रुटी दिसून येत आहेत. पाणीपुरवठा योजनेत लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांच्या सर्व समित्या बरखास्त करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच या योजनेंतर्गत नवीन समिती स्थापन करीत असताना धोरणात्मक सूचनांचा विचार करून आवश्यक ते फेरबदल करण्यात येईल. याशिवाय पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहावी यासाठी या समितीत तांत्रिक अभियंत्याला सामावून घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना सांगितले. केंद्रामार्फत नवीन पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला नव्या योजना हाती घेण्यापूर्वी जुन्या योजना पूर्ण कराव्यात, असे आदेश दिले आहेत. तसेच नवीन योजना घेतल्यास सदर योजना सन २०१७ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे कळविले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होण्यासाठी राज्य शासनामार्फत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
पुरवठा योजनेच्या सर्व समित्या बरखास्त करणार
By admin | Updated: July 23, 2015 01:31 IST