म्हसावद : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करताना त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी समाज परिवर्तनाचा अनोखा संकल्प येथील धनगर समाज मंडळाने घेतला आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात समाजात साखरपुडा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने म्हसावद येथे शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने सकाळी प्रतिमा पूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मोहन फणसे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ‘परिवर्तनाची लढाई’चे चंद्रकांत हजारे व प्रमुख अतिथी म्हणून देवीदास हटकर, मुख्याध्यापिका सुरेखा गुजर, रमाकांत पाटील उपस्थित होते. या वेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र मांडले. याचवेळी समाज बांधवांनी अहिल्याबाई होळकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी समाजातील अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रामुख्याने साखरपुडा बंद करणे व लग्नाच्या बस्त्यासाठी जाणारी अनावश्यक गर्दी टाळणे हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांसंदर्भात समाजातील कार्यकर्ते गावागावात फिरून लोकजागृती करणार आहेत. या निर्णयाचे समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या वेळी दिलीप चैत्राम धनगर, अंबालाल लांडगे, प्रा.श्रीराम सूर्यवंशी, भटू धनगर, अनिल सूर्यवंशी, विनोद ठाकरे, ज्ञानेश्वर लांडगे, अशोक लामगे, गोरख ठाकरे, प्रकाश सूर्यवंशी, विजय भलकार, किशोर लांडगे, नानाभाई मुजगे, चिंतामण लांडगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गणेश सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अशोक बागले यांनी तर आभार डॉ.रजनीकांत सूर्यवंशी यांनी मानले. (वार्ताहर)
धनगर समाजात साखरपुडा बंद
By admin | Updated: June 1, 2014 00:28 IST