ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. - मुंबईत रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांच्या भरवशावर आपण सणवार साजरे करत आहोत आणि आपले मुख्यमंत्री मुंबईला पाटणा झाल्याचे म्हणतात, म्हणजे हा एकंदरित त्यांनी केलेला पोलिसांचा अपमान आहे, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
वरळीतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी मुंबई शहराची बदनामी करुन त्याच शहरात राहायचं. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईत फिरताना शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेतात आणि उल्हासनगरमध्ये पप्पू कलानीचा आशीर्वाद घेतात. तुमच्या पोस्टरवर दाऊदचा, पप्पू कलानीचा, नरेंद्र मोदींचा किंवा अमित शहांचा फोटो लावा, पण शिवरायांचा लावायचा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेनीं भाजपावर हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे -
- मुंबई शहराची बदनामी करुन त्याच शहरात राहायचं. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही.
- महापालिकेची कामं काय असतात हे पाहिलं समजून घ्या आणि मग बोला.
- शिवसेनेचा जन्म अन्यायावर वार करण्यासाठी झाला, आहे अन्याय सहन करण्यासाठी नाही.
- मनपा निवडणुकीचा निकाल पुढच्या राजकारणाची दिशा बदलेल.
- तुम्ही कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...मुंबई शहराची बदनामी करून त्याच शहरात तुम्ही राहता.
- पाटणाशी तुलना करून परप्रांतीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी दुखावल्यात.
- मेट्रोचा उल्लेख भाजप जाहीरनाम्यात करते. पण मेट्रोची कामे काँग्रेस ने केली.
- तुम्ही आता तीर्थप्रसाद घ्यायला फिरत आहात पण वेळप्रसंगी रक्तदान करायला शिवसैनिकच पुढे असतो.
- भाजपला 'मुंबईत फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद' उल्हासनगरमध्ये फिरताना कलानींचा आशीर्वाद
- ज्यांनी शिवरायांचा ध्वज कापला त्यांना शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्याचा अधिकार नाही.
- मुंबई महापलिकेचं केंद्राकडून कौतुक होतं, मग गाढव कोण? केंद्र सरकार कि राज्य सरकार?
- कायद्या- सुव्यवस्था आपण नाही तर मुख्यमंत्री राखणार का?