मुंबई - महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात कोरोनाचे नवीन ६५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील मुंबईत २२, पुण्यात ९, ठाण्यात ६, पिंपरी-चिंचवडमध्ये २, कोल्हापूर आणि नागपूर येथे १ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असले तरी दिलासादायक चित्र म्हणजे ३०० कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५०६ इतकी आहे.
११५०१ नमुन्यांपैकी ८१४ कोरोना संक्रमित
जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात ११ हजार ५०१ नमुने तपासले आहेत. ज्यात ८१४ कोरोना रुग्ण आढळले. त्यातील एकट्या मुंबईत ४६३ रुग्ण समोर आले होते. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ७ रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त होते. मृतांमध्ये पहिल्या रुग्णाला हायपोकेल्सेमिया आणि नेफ्रोटिक सिड्रोम आजार होता. दुसरा रुग्ण कॅन्सरग्रस्त होता. तिसऱ्या रुग्णाला स्ट्रोक होता. चौथ्या रुग्णाला डायबिटिक किटोएसिडोसिस आजाराने पीडित होता.
देशात कोरोना रुग्ण किती?
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसत आहे. सक्रीय रुग्ण संख्या ३ हजारांवर पोहचली आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात ३७५३ सक्रीय रुग्ण होते. त्यातील बहुतांश केरळमधील आहेत. केरळमध्ये १३३६ सक्रीय रुग्ण आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये जगात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला होता. सर्वात आधी चीनच्या वुहान शहरात कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर अतिशय वेगाने हा व्हायरस जगभरात पसरला. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण ३० जानेवारी २०२० मध्ये केरळमधील त्रिशुर येथे सापडला. इथल्या २० वर्षीय विद्यार्थिनीला जी चीनच्या वुहानमधून भारतात परतली होती ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर देशात कोरोना पसरत गेला. एप्रिल २०२० मध्ये देशात वेगवेगळे कोरोना रुग्ण आढळले. भारतात २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी देशात २४ मार्च २०२० मध्ये २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता.