मुंबई - भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि राज्यात एकच शोककळा पसरली. त्यांच्या कार्यकर्त्यांना तर या घटनेचा जबर धक्का बसला. मुंडे यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईत अंत्यदर्शनासाठी आणल्यानंतर ते परळी येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार होते. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परळी येथेही जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी मुंबई भाजपतर्फे कार्यकर्ते आणि मुंबईत वास्तव्यास असलेल्या बीड, लातूरवासियांसाठी विशेष ट्रेनची सोय सीएसटी येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मध्य रेल्वेशी संपर्क साधण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून सीएसटी-लातूर विशेष ट्रेन रात्री १0.५0 वाजता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांचा मोठा लोंढाच जाणार असल्याचा अंदाज असल्याने सोळा डब्यांची ट्रेन देण्यात आली. यासाठी ११ जनरल डबे, दोन एसी, दोन स्लीपर कोच आणि गार्ड कम जनरल डबा जोडण्यात आला. या ट्रेनची माहीती कार्यकर्त्यांना मिळावी यासाठी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयाव्दारे प्रत्येक पदाधिकार्यांशी संपर्क साधून त्यांच्याव्दारे कार्यकर्त्यांना माहीती देण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. ही ट्रेन कार्यकर्त्यासाठी एक तास अगोदरच सीएसटी स्थानकात लावण्यात आली होती. ही ट्रेन बुधवारी सकाळी साडे आठ वाजता पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी त्याचदिवशी रात्री नऊ वाजता निघणार होती.
अन् कार्यकर्त्यांसाठी केली लातूरसाठी विशेष ट्रेनची सोय
By admin | Updated: June 3, 2014 22:32 IST