नागपूर : जंगलांच्या जमिनी, शहरालगतच्या शासकीय जमिनी तसेच खोल भागात भरण भरून केले जाणारे अतिक्रमण व अवैध बांधकाम यावर नियंत्रणासाठी उपग्रहांमार्फत सर्वेक्षणाचे तंत्रज्ञान वापरले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. आता याबाबतचे प्रेझेंटेशनही केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई उपनगरासह राज्यात आवश्यक तेथे जमिनींचे उपग्रहांमार्फत दरमहा छायाचित्र घेतले जातील. यामुळे नव्याने होत असलेली बांधकामे व अतिक्रमणे दिसून येतील. संबंधित अहवाल दरमहा संबंधित महापालिकांना सादर केला जाईल. त्यानुसार संबंधित अतिक्रमणांवर महापालिकेला कारवाई करावी लागेल. कारवाई न केल्यास महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.मुंबई उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे तिवरांच्या झाडांची कत्तल होत असून याप्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणा मनीषा चौधरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. झाडांची कत्तल करून मातीचे भरण टाकून तेथे नवनवीन झोपडपट्ट्या उभारल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी तिवरांच्या झाडांची कत्तल झाली नसून कांदळवन व ५० मीटर अंतरावरील झोपडपट्टी यादरम्यान भरण टाकण्यात आल्याचे आाढळून आले आहे. (प्रतिनिधी)
अतिक्रमणांवर उपग्रहांमार्फत नियंत्रण
By admin | Updated: December 23, 2014 23:43 IST