मुंबईच्या बैठकीत कारणमीमांसा : सरकारने कार्यकर्त्यांना बळ द्यावे
नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांनी पाठविलेले आपल्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी फेटाळले. मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागावे व त्वरित कार्यकारिणी तयार करावी, असे निर्देशही देण्यात आले. दादर येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी जिल्हानिहाय आढावा घेतला. बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. नागपूरच्या बैठकीत रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी खासदार विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार म्हणाले, निवडणूक काळात सरकार व संघटनेत ताळमेळ नव्हता. आपण प्रसिद्धीत मागे पडलो. आरोपांना उत्तरे दिली नाही. येत्या निवडणुकीत याकडे लक्ष द्यावे. विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार जवळपास जाहीर झाले आहेत. ते लोकांमध्ये फिरत आहेत. वेळेवर उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवार मतदारांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार येत्या १५ दिवसात जाहीर करा, अशी मागणीही मुत्तेमवार यांनी केली. माजी खासदार मुकुल वासनिक यांनी विधानसभा जिंकायची असेल तर जनतेची कामे करावी लागतील, असा मुख्यमंत्र्यांसमक्ष सल्ला दिल्ला. सतीश चतुर्वेदी यांनी काँग्रेस संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी सरकारने बळ देण्याची मागणी केली. विकास ठाकरे म्हणाले, भाजपने दोन वर्षांपासून उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसने शेवटपर्यंत मुत्तेमवार यांची उमेदवारी जाहीर केली नाही. केंद्र व राज्य शासनाने ताकद दिली असती, तर चित्र वेगळे असते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना उमेदवाराचे जनतेतील काम बघा. बाहेरचे उमेदवार लादू नका, प्रयोग करू नका, नाहीतर सहाही जागा हातून जातील, असा धोकाही त्यांनी वर्तवित पक्षश्रेष्ठींना सतर्क केले. पालकमंत्र्यांनी उरलेल्या दिवसात शहरातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करायला हवे. बूथ कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर नियुक्ती देऊन, विशेष कार्यकारी अधिकारीपद देऊन ताकद द्यावी लागेल. मंत्र्यांनी जनतेत जाऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीला नगरसेवक प्रशांत धवड, रेखा बाराहाते, आभा पांडे, शीला मोहोड, सरस्वती सलामे, रेखा नंदनवार, निमिषा शिर्के, दीपक वानखेडे, बाबुराव तिडके, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, प्रकाश वसू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)