चंद्रपूर : वेकोलिच्या कोळसा खाणीतून नियमबाह्य कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकविरुद्ध गुरुवारी थेट पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच पुढाकार घेत कारवाई केली. या वेळी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफाही सोबत होता.वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीतून कोळशाची वाहतूक करताना कोणत्याही नियमाचे पालन केले जात नाही. क्षमतेपेक्षा अधिक कोळसा ट्रकमध्ये भरलेला असतो. ट्रकवर ताडपत्रीही नसते. त्यामुळे कोळसा खाली पडून प्रदूषणात वाढ होते. याबाबतची तक्रार पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे आली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी कदम यांनी खाणीच्या वे-ब्रिजवर पाहणी केली असता तसाच प्रकार आढळून आला. या वेळी २२ ओव्हरलोड ट्रक अडविण्यात आले. त्यानंतर दुर्गापूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या ट्रकविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
पर्यावरणमंत्र्यांनीच पकडले कोळशाचे ट्रक!
By admin | Updated: January 30, 2015 04:08 IST