मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकलने प्रवास केला. कल्याण येथील कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला फौजफाटा बाजूला ठेवत छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून लोकल पकडली. ऐन गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांसाठी नित्याची बाब आहे. तुडुंब भरलेल्या असल्या तरी लोकल गाड्या मात्र नियमित धावत असतात. सोमवारी दुपारी कुलाब्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांना सायंकाळी फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटनासाठी कल्याणला पोहचायचे होते. या कार्यक्रमास वेळेत पोहचता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट ६.२९ कल्याण फास्ट लोकल गाठली. सीएसटी ते कल्याण असा प्रवास त्यांनी केला. कल्याणपर्यंतच्या या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी सहप्रवाशांशी गप्पा मारल्या. ऐन गर्दीच्या वेळी थेट मुख्यमंत्रीच आपल्या डब्यात आल्याचे पाहून प्रवासी आश्चर्यचकीत झाले. यावेळी काहींनी रेल्वे प्रवासातील समस्यांची गा-हाणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तर, काहींनी त्यांची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याची संधी साधली. (प्रतिनिधी)