- राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर- विरोधकांचा सभात्यागमुंबई : राज्यात पाच वर्षे युतीची सत्ता होती. मात्र त्यांचा कारभार अनुभवल्यानंतर त्यांना जनतेने एकदा नव्हे तर लागोपाठ तीन वेळा नाकारले, असा चिमटा विरोधकांना काढतानाच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आघाडीलाच संधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य पिछाडीवर जात असल्याची विरोधकांची टीका खोडून काढली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी मात्र घोषणाबाजी करीत सभात्याग केला. तत्पूर्वी, राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्याचे दाखले चव्हाण देत होते त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले. मात्र सरकार खंबीरपणे शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिले. या कालावधीत जवळपास ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचे वाटप सरकारने केले. राज्य सरकारची असलेली ताकत आणि दानत यामुळेच हे शक्य झाले. शेतकर्यांना यापूर्वी इतकी मदत कुठल्याही सरकारने दिलेली नव्हती. गिरणी कामगारांना घरे, मोनो, मेट्रो, इस्टर्न फ्री वेसारखे मुंबईतील प्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी, गुटखाबंदी, मनोधैर्य, सुकन्या योजना, शालेय शिक्षणासाठीचे अनेक निर्णय, ई प्रशासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ६० हजार नवीन रिक्षा परवाने, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा, सावकारी प्रतिबंधक कायदा अशा अनेक उपलब्धींचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी राज्यपालांच्या अभिभाषणावर सदाशिवराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळा नांदगावकर, रवींद्र वायकर यांची भाषणे झाली. (विशेष प्रतिनिधी)
राज्यात पुन्हा संधी आघाडीलाच : मुख्यमंत्री
By admin | Updated: June 5, 2014 22:34 IST