पंढरपूर : विठ्ठलाची पूजा केल्यानंतर अनेकांनी विचारले की काय मागणे मागितले; विठ्ठलाकडे काय मागणार, तो मनातील जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे, पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी, असे सांगत विठ्ठलाला काय साकडे घातले याचे संकेत दिले. तर अनुराधा पौडवाल यांनी विठ्ठलाचे भक्तीगीत गात त्यांच्या संस्थेमार्फत वारकरी महिलांसाठी फिरती स्वच्छतागृहे पुरविण्य़ात आल्याचे सांगितले.