मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले असून, जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. ''देशात जनतेमध्ये नरेंद्र मोदींच्या बाजूने सुप्त लाट आहे, असे आम्ही नेहमी सांगत होतो. देशातील सर्वसामान्य जनता मोदींना मत देण्यास इच्छुक होती. देशात प्रो इन्कम्बन्सी दिसत होती. सध्याचा कल पाहता गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकू अशी अपेक्षा आहे., असे मुख्यमंत्री म्हणाले. '' सध्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. अनेक समस्या आहेत, या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकीत सहकार्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाईंचे रामदास आठवले आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
राज्यातील जनतेने दिलेला कौल अभूतपूर्व, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:10 IST