ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - गेल्या महिनाभरात २५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला केंद्र सरकारने मर्दानगी दाखवत धडा शिकवावा असे विधान शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पाकिस्तानसोबत फक्त चर्चा थांबवून उपयोग नसून पाकला त्यांच्या हद्दीत घुसून ठोकून काढले पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी पाकविरोधात कठोर भूमिका घ्या अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. पाक सैन्याने भारताच्या १३ गावांवर हल्ला केला. यात दोन नागरिक मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झाले. सीमेवरील १३ हजार नागरिक स्थलांतर करत असून भारतासाठी ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. २००३ नंतर प्रथमच पाकने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मात्र आपण विझलेल्या फटाक्यासारखे थंड कसे असा चिमटाही त्यांनी मोदी सरकारला काढला आहे. काँग्रेसची सरकार असताना अशी घटना घडली असती तर आपण सर्व त्यांच्यावर तुटून पडलो असतो. आता जनतेलाही तुमच्याकडून ठोस कृतीची अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारलाउद्देशून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे पाकचा आचरटपणा सहन करणारे नेते नसल्याने त्यांनी दिल्ली मर्दांचे सरकार आले आहे हे जनतेला दाखवून द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.