मुंबई : शेतमाल नियमन मुक्तीनिमित्ताने नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी, असे पत्र मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना पाठविले.केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधीमधून ही खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. नियमन मुक्तीनंतर सुरुवातीला व्यापाऱ्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार त्यांच्यापुढे झुकले नाही. राज्यातील बाजार समित्या हळूहळू सुरू झाल्या, तरी नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवत आठ ते दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवल्या. त्यामुळे कांद्याच्या भावाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्यांना त्याच्या विक्रीची चिंता आहे. त्यातच आठ-दहा दिवसांपासून सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे. साहजिकच त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी साकडे घातले आहे. (विशेष प्रतिनिधी)>लासलगाव बाजार समिती बरखास्तीकडे लासलगाव बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पणन विभागाने कार्यवाही सुरू केली असून, कुठल्याही क्षणी बरखास्तीचा निर्णय होऊ शकतो.
नाफेडमार्फत कांदा खरेदी करा
By admin | Updated: August 3, 2016 05:35 IST