कल्याण : कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यामधील जे चार युवक मे महिन्यापासून बेपत्ता आहेत त्यांच्या पालकांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली असून, ही मुले दहशतवादी संस्थांशी संबंधित नाहीत. आम्ही जर काही खोटे बोलत असू तर आमची नार्को टेस्ट करा; पण आमच्या मुलांना परत आणा, असे साकडे त्यांना घातले. चिंतन जोशी हे त्या कुटुंबीयांना घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत एका पाल्याच्या कुटुंबीयांनी आमची मुले चांगली असून ती उच्च शिक्षण घेत आहेत. ती सर्वच मुले खूप हुशार असून, ते असे कृत्य करणार नाहीत. त्यांना परत आणा, अशी विनंती त्यांनी केली. ती मुले नेमकी कुठे गेली याचा शोध लागेलच, त्यासाठी आवश्यक ते आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. ज्यांनी त्यांना असे कृत्य करायला भाग पाडले असेल त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल, पालकांनी थोडा धीर धरावा, संयम बाळगावा. सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात राहावे, असा सल्ला सिंग यांनी दिल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले. सुरक्षा यंत्रणा याबाबतची सर्व माहिती घेत असून त्यांचा छडा लागेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
‘आमच्या मुलांना परत आणा’
By admin | Updated: July 19, 2014 02:47 IST