वरपगाव : दिवसेंदिवस पाऊसकाळ कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही फूट खोल खोदली तरी पाणी कसे लागणार! हे शंभर टक्के खरे असताना शेतकरी मात्र पाणाड्यांच्या भुलथापांना बळी पडून शेकडो कूपनलिका खोदण्याचे काम करीत असून केवळ मे महिन्यात तालुक्यात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. मात्र पाणी न लागल्याने त्यावरील करोडोंचा खर्च फुकट गेला असून या पाणाड्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्याच्या दुर्गम, अतिदुर्गंम, वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर बहुतांश गावांत एक ड्रम पाण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वत:ची बोअरवेल असावी या भावनेतून शेतकरी बोअरवेल खोदण्याचा विचार करतो. मात्र शास्त्रीय पद्धतीने पाणी न शोधता आजूबाजूच्या गावांतील पाणी दाखविणारे (पाणाडे) यांच्या मागे लागून त्यांना आपला जागेतून फिरवून पाणी दाखविण्याची विनंती करतो. तालुक्यात २० ते ३० असे पाणाडे आहेत. मात्र यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने शेतकर्यांची फसवणूक होते आहे, १० हजारांपासून ते २५, ५० हजारांपर्यंत कूपनलिका खोदण्यासाठी खर्च येतो. याशिवाय पाणाड्यांचा ‘मानपान’ वेगळाच. त्यामुळे इतके करूनही पाणी लागेलच याची खात्री नसल्याने शेतकरी पुरता बरबाद होतो. तर शास्त्रीय पद्धतीने जमिनीमध्ये पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे जमिनीची तपासणी केली जाते. जमिनीमध्ये सहा व्होल्ट बॅटरीच्या साहाय्याने ३०० ते १००० हजार फूट खोलीपर्यंत डी.सी. करंट सोडला जातो. या करंटच्या साहाय्याने जमिनीचा ‘रेझिस्टन्स’ मोजला जातो. त्यामुळे भूगर्भामध्ये पाणी आहे किंवा नाही ते समजते. यासाठी जमिनीच्या वरील थरावर स्टीलचे रॉड ठोकून नंतर त्यांना वायर जोडून त्या मशिनला जोडण्यात येतात. नंतर त्यात करंट सोडून रिडिंग घेण्यात येते. जमिनीची तपासणी करताना आठ दिशा लक्षात घेण्यात येतात. त्यामध्ये पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे ते पाहिले जाते. त्यानंतर अचूक जागा निश्चित केली जाते. थोडक्यात सांगायचे तर या पद्धतीमध्ये जमिनीची कुंडलीच तयार केली जाते. विहीर किंवा बोअरवेलला किती प्रमाणात पाणी मिळेल याची साधारण कल्पना येते. या यंत्रणेद्वारे किती खोल फुटावर किती पाणी मिळेल? दिवसाला किती लीटर पाण्याचा उपसा होऊ शकतो? याचा अंदाज येतो. त्यामुळे त्यावर किती क्षमतेचा पंप बसवावा हेही निश्चित ठरवता येतो. विशेष म्हणजे एखाद्या शेतकर्याने पूर्वी खोदलेल्या विहीर किंवा बोअरवेल मधीलही पाण्याची दिशा ठरवता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्यांना व जमिनीखालील पाण्याबाबतची हमी मिळते.
बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही
By admin | Updated: May 30, 2014 00:14 IST