हितेन नाईक,
पालघर- सातपाटी येथून समुद्रात मासेमारीला जाताना,धोकादायक खडकांपासून बचाव व्हावा यासाठी तत्कालीन आमदार फंडातून उभारलेला बोया मागील सात दिवसा पासून तुटून शिरगावच्या समुद्रकिनाऱ्यावर उभा आहे. महाराष्ट्र मेरी टाईम विभागाने तात्काळ याची दखल घेत हा बोया पूर्ववत मूळ जागी लावावा अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.सातपाटी हे एक कोकण किनारपट्टीवरील एक प्रगतिशील बंदर असून त्यातून पापलेट,दाढा,घोळ, ई, आर्थिक उत्पन्न देणाऱ्या मच्छीची मोठया प्रमाणात मासेमारी केली जाते. मच्छीच्या साठवणूकीची चांगल्या प्रतीच्या साधनांनी काळजी घेतली जात असल्याने महाराष्ट्रातील मोठमोठे एक्स्पोर्टर मासे खरेदी साठी सातपाटी च्या मच्छीला प्रथम पसंती देत असतात. त्यामुळे शासनालाही कोट्यवधी रु पयाचे परकीय चलन मासेमारी व्यवसायातून मिळत असते. सातपाटी हे बारमाही तरते बंदर व्हावे हा प्रस्ताव अनेक वर्षा पासून शासन दरबारी पडून असून अनेक मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी सातपाटी ला भेटी दिल्या नंतर बंदर उभारणीची अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र काळाच्या ओघात हि आश्वासने हवेत विरून गेली आहेत. मागील अनेक वर्षा पासून सातपाटी ची खाडी अनेक समस्यांशी सामना करीत असून कोटयवधी रु पयांचा निधी उपलब्ध होऊनही नियोजनशून्यतेने मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडला आहे. खाडीत साचलेला गाळ ही समस्या मच्छीमारांची मोठी डोकेदुखी बनली आहे. हा गाळ काढण्या साठी मिळालेल्या सुमारे २३ कोटीच्या निधीचे काय झाले? याचे नेमके उत्तर ना मेरी टाईम बोर्डाकडे आहे, ना पतन विभागाकडे, ना जिल्हा प्रशासनाकडे आहे. त्यामुळे आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो अशी अवस्था सध्या आहे. त्यातच मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याच्या नावाखाली सतराशे साठ संघटना निर्माण झाल्याने त्यांच्यात एकजूटीचा अभाव आहे. आपल्या प्रश्नांची तड कायमस्वरूपी लागत नसल्याने मच्छीमार सैरभैर झाले आहेत, त्याचा फायदा राजकीय पक्ष उचलू पाहत आहेत. >आमदार फंडातून झाली उभारणी; देखरेख देखभाल मेरी टाईमकडेसातपाटी च्या नौकायन मार्ग समुद्रात मासेमारीला जातांना उतरेकडे असणाऱ्या धोकादायक खडकांच्या रांगा पासून वाचण्यासाठी माजी आमदार मनीषा निमकर यांच्या आमदार फंडातून दोन दीपस्तंभ खाडीत उभारण्यात आले होते. त्यांच्या देखरेख आणि देखभाल दुरु स्तीची जबाबदारी महाराष्ट्र मेरी टाईम विभागाकडे होती. मागील सात दिवसापासून समुद्राला आलेल्या तुफानी लाटांच्या तडाख्याने तरंगत असलेला हा बोया तुटून वाहत जाऊन शिरगावच्या समुद्रकिनारी बेवारस स्थितीत लागला आहे. तो काही मच्छीमारांनी किनाऱ्या वर आणून ठेवला आहे. १ आॅगस्ट पासून मासेमारी व्यवसायाला सुरु वात होणार असल्याने व या कालावधीत समुद्री वातावरण वादळी असल्याने मेरी टाईम विभागाने या बोयाची दुरु स्ती करावी अशी मागणी मच्छीमारा मधून केली जात आहे. या संदर्भात सात पाटी मेरी टाईम विभागाचे अधिकारी प्रसाद पारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.