वसई : वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्या पत्नीच्या मदतीने व्यावसायिक गाळा विक्री करण्यासाठी बोगस दस्ताऐवज आणि पहिल्या पत्नीचे मृत्यूचे खोटे दाखले सादर केले असून, याप्रकरणात महापालिका आणि दुय्यम उपनिबंधकही सहभागी झाले आहेत. तसेच सरकारचा लाखो रुपयांचा महसूलही बुडवल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात केली आहे.मौजे आचोळे, नालासोपारा पुर्व सर्वे.क्र.१४६ या मिळकतीवरील अंबिका अपार्टमेंट या इमारतीतील गाळा क्र.९ सुवर्णा सुभाष साटम यांच्या मालकीचा होता. सुवर्णा साटम यांचे २८ एप्रिल २००३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पती आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष वसंतराव साटम यांनी हा गाळा रामभाऊ म्हाळगी पतसंस्थेला सन २००६ मध्ये विकला. त्यावेळी त्यांच्या मयत पत्नीच्या जागी दुसऱ्या पत्नीला सुवर्णा साटम म्हणून ऊभे करून सुभाष साटम यांनी दस्त नोंदणी केली. त्यांच्या दुसऱ्या पत्नी अर्पिता साटम यांनी सुवर्णा साटम यांच्या नावाने सह्याही केल्या. मयत पत्नीला जिवित दाखवून हा व्यवहार करतांना साटम यांनी शासनाचीही आर्थीक फसवणूक केल्याचेही म्हटले आहे.हा गाळा पतसंस्थेला विक्री करण्याचे ३१ आॅगस्ट २००४ ला ठरवण्यात आले होते. त्यावेळी या गाळ्याचे शासकिय मूल्यांकन ३४ लाख २७ हजार इतके करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी या गाळ्याची विक्री करण्यात आली. त्यावेळी शासकिय मूल्यांकन वाढले असताना मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी गाळ्याची किंमत ३ लाख ६५ हजार ६४० इतकी दाखवण्यात आली. काय म्हटले आहे, या तक्रारीतशासनाचा किमान दोन लाख रुपयांचा महसुल बुडवण्यात आला आहे. तर ३४ लाखांचा गाळा ३ लाखांना विक्री केल्याचे दाखवून साटम यांनी ३० लाख रुपयांचा अपहारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही लबाडी उघडकिस येवू नये यासाठी त्यांनी राजकिय ताकदीचा वापर करून पत्नी सन २०११ मध्ये मयत झाल्याचे प्रमाणपत्र तयार केले. विशेष म्हणजे साटम यांनी २००८ साली पत्नी मयत झाल्यानंतर मृत्यु प्रमाणपत्रही घेतलेले होते. पोलीसांत तक्रार करण्यात आल्याचे मला समजले आहे. हे प्रकरण खोटे आहे. बघू या काय होते ते, असे सुभाष साटम यांनी लोकमतला सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्षांकडून फसवणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 03:13 IST