Pahalgam Terror Attack News: जम्मू-काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील होते. कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींच्या मृत्यूने या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पहलगाम इथं क्रूर दहशतवाद्यांना धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला. या हल्ल्याने देशभर संताप व्यक्त केला जात असून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आधार दिला होता. तसंच या कुटुंबांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीबाबतचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच मृत संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोणी-कोणी गमावला जीव?
मृत पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता.
हेमंत सतीश जोशी – ठाणे(महाराष्ट्र)अतुल श्रीकांत मोने – मुंबई(महाराष्ट्र)संजय लक्ष्मण लेले - ठाणे(महाराष्ट्र)दिलीप देसले – पनवेल(महाराष्ट्र)संतोष जगदाळे – पुणे(महाराष्ट्र)कौस्तुभ गणबोटे – पुणे(महाराष्ट्र)