Bhaiyyaji Joshi Clarification: घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला. वादाचे पडसाद सर्वत्र उमटल्यावर भय्याजी जोशी यांनी त्यावर खुलासा केला.
भय्याजी जोशी यांचे स्पष्टीकरण
मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतंय. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याबाबत दुमत असल्याचं काहीही कारण नाही. भारताची एक विशेषत: आहे की येथे विविध भाषा बोलणारे लोक परस्परांना सोबत घेऊन चालतात. त्यांच्यात भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच भारत देश हे जगासमोर आदर्श उदाहरण आहे. मुंबईतही बहुभाषिक लोक आहेत आणि ते परस्परांवर स्नेहसंबंध ठेवूनच मुंबईचं जीवन चालतंय. स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा असते की बाहेरून येणाऱ्यांनी त्यांच्या भाषेसह मराठी भाषाही शिकावी, त्याचं अध्ययन करावं. मराठी भाषा ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भाषा आहे. ती अनेकांनी अभ्यासावी असंच आम्हाला वाटतं. माझ्या वक्तव्यावर जे राजकारण सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही, तो माझा विषय नाही.
मुंबईची भाषा मराठीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
"भय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकून मी त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. याच्यावर सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही दुमत असेल असं मला वाटत नाही. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे," असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या मुद्द्यावर बोलताना दिले.