मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसादरम्यान लोकलचा बिघाड झाल्याने पर्यायी वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट बसने मुंबईकर चाकरमान्यांना आधार दिला. लांब पल्ल्यांच्या बेस्ट बसने चाकरमान्यांची पायपीटही वाचली.शुक्रवारी सुरु झालेल्या पावसाची संततधार तिसऱ्या दिवशीही कायम असून, शुक्रवारच्या पावसाने तर मुंबई ठप्प केली होती. मुंबईची लोकल बंद पडल्याने मुंबईकरांच्या वाटा बंद झाल्या होत्या. परंतु यावर उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बेस्ट गाड्या रस्त्यावर उतरविल्या. मात्र सखल भागांत पाणी साचल्याने मुंबईची रस्ते वाहतूकही बंद पडली होती. त्यावरही उपाय म्हणून प्रशासनाने बेस्ट बसचे मार्ग वळवित प्रवाशांना आधार दिला होता. विशेषत: लाल बहादूर शास्त्री मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसादरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बेस्ट बसने प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले. लाल बहादूर शास्त्री मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या उशीराने धावत असल्या तरी प्रवाशांना किमान सायनपर्यंत पोहचविण्यात बेस्ट बसने मोलाची भूमिका बजावली होती.रविवारी पावसाचा जोर ओसरला असला आणि लोकलही वेळेत धावत असल्या तरी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त गाड्यांचा ताफा तैनात असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी सांगितले.
ऐन पावसात ‘बेस्ट’ आधार
By admin | Updated: June 22, 2015 02:59 IST