मुंबई : अनेक वेळा निवडून येणे हे यापूर्वी आजच्या तुलनेत सोपे होते. आता लोकांचे आणि प्रसारमाध्यमांचे सतत तुमच्यावर लक्ष असते. त्यामुळे अधिक काळजी घ्या; आपला कारभार स्वच्छ व पारदर्शक ठेवा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपाच्या आमदारांना दिला.रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भाईंदर येथील संकुलात भाजपा आमदारांकरिता तीन दिवसांचा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. दानवे यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप झाला.ते म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपा जिंकते; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे आपापल्या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. दानवे म्हणाले की, विकासाच्या योजना आपल्याला राबवायच्या आहेत. धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत. त्या निर्णयांचे परिणाम दिसायला काही महिन्यांचा कालावधी लागेल. सरकारचे निर्णय लोकांमध्ये जाऊन सांगणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ही जबाबदारी किती प्रभावीपणे राबवता यावर सरकारची प्रतिमा अवलंबून असेल, असे दानवे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
प्रसारमाध्यमांचे लक्ष असल्याने काळजी घ्या
By admin | Updated: March 2, 2015 01:44 IST