बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा!
By Admin | Published: February 8, 2016 02:41 AM2016-02-08T02:41:19+5:302016-02-08T02:41:19+5:30
बंजारा भाषिक बांधवांचा साहित्य संमेलनात हुंकार.
डॉ. किरण वाघमारे /आत्माराम कनिराम राठोड साहित्यनगरी (वाशिम) : बंजारा भाषेत मौखिक साहित्याची समृद्ध पंरपरा आहे. या भाषेतील साहित्य हे अस्सल लोकजीवन दर्शविणारे आहे. त्याचे जतन होणे काळाची गरज आहे. बंजारा भाषेचा भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये अंतर्भाव केला जाणे आवश्यक असून, या भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळालाच पाहिजे, असा हुंकार देशभरातून आलेल्या समस्त बंजारा बांधवांनी रविवारी वाशिम येथील साहित्य संमेलनाच्या गोरपीठावरून केला. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलनाचा रविवारी थाटात समारोप झाला. यावेळी घेण्यात आलेल्या ठरावात बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा, असा आग्रह सर्व मान्यवरांसह उपस्थित बंजारा बांधवांनी धरला. याप्रसंगी मंचावर संमेलनाध्यक्ष गबरूसिंह राठोड, स्वागताध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात ठरावांचे वाचन करण्यात आले. भारतीय संविधानातील कलम क्रमांक २९ अंतर्गत ३५१ नुसार, भारतात विखुरलेला जो काही आदिवासी समाज आहे, त्यांची वेगळी भाषा व संस्कृती आहे. भाषा व संस्कृतीच्या संवर्धनचा घटनादत्तक अधिकार या समाजाला मिळवा, बंजारा बोलीभाषा जतन करण्यासाठी बंजारा साहित्य अकादमी व बंजारा साहित्य परिषद स्थापन करण्यात यावी, भारतीय घटनेच्या शेड्यूल आठमध्ये बंजारा भाषेचा अंतर्भाव करण्यात यावा, यूजीसीद्वारे भाषा संशोधन व संवर्धन करण्यात यावे, भारत सरकारद्वारे बंजारा साहित्यिकांचा देश व राज्य पातळीवर सन्मान केला जावा, बंजारा भाषा देवनागरी लिपीमध्ये अंतभरूत करावी, शेतकर्यांसाठी स्वामिनाथन आयोग स्थापन करावा, शालेय साहित्यात बंजारा साहित्याचा समावेश करावा तसेच स्व. रामसिंहजी भानावत यांच्या सुचनेनुसार बंजारा समाजाचा इतिहास व संशोधनासाठी विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यात यावे आदी ठरावांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वच ठरावांना बंजारा बांधवांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या, असा आग्रह धरला.