मुंबई : उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग विझविणाऱ्या जवानांच्याच जिवावर बेतत असल्याचे अंधेरी (प़) येथील आगीच्या दुर्घटनेतून पुन्हा एकदा उजेडात आले आहे़ लोटस पार्क इमारतीमध्येही अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्यामुळे आग विझविणे जिकिरीचे बनले़ या निष्काळजीपणास जबाबदार इमारतीच्या मालकावर महाराष्ट्र अग्निशमन कायदा, आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार आहे़महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायद्यानुसार उत्तुंग इमारतींमध्ये अग्निरोधक यंत्रणा असणे बंधनकारक आहे़ अग्निशमन दलाची मदत पोहोचेपर्यंत वॉटर स्प्रिंकल्स, आग विझविण्याचे उपकरण, फायर अलार्म, जनरेटर्स अशी अग्निरोधक यंत्रणा असल्यास आगीचा फैलाव रोखणे शक्य होते़ परंतु उत्तुंग इमारतींमध्ये बसविण्यात आलेल्या या यंत्रणांची नियमित देखभाल होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत असतात़ लोटस पार्कमध्येही हीच स्थिती होती, असा अहवाल अग्निशमन दलाने आयुक्तांना दिला आहे़ याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी या दुर्घटनेची संपूर्ण माहिती मागविली आहे़ या इमारतीचे दर सहा महिन्यांनी फायर आॅडिट होत होते का? यापूर्वी हे आॅडिट कधी करण्यात आले होते, याबाबत अहवाल मागविण्यात आला आहे़ त्यानंतर इमारतीच्या मालकावर कारवाईबाबत निर्णय होईल़ मात्र महाराष्ट्र अग्निशमन कायदा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि निष्काळीजपणासाठी संबंधित मालकावर कारवाई होईल, असे कुंटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
इमारतींच्या अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त
By admin | Updated: July 19, 2014 02:44 IST