नागपूर : अस्पृश्यता आणि जातीभेदामुळे जनमानसात काळवंडलेली प्रतिमा पुसून काढण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे़ शुक्रवारपासून नागपुरात होणा-या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत प्रत्येक गावातील मंदिरे, जलाशय व स्मशानभूमीत सर्वांनाच प्रवेश मिळावा, अशा आशयाचा ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली़ वैद्य म्हणाले, प्रत्येक गावात जातीगत भेदभाव दिसून येतो. हे दूर करण्यासाठी संघाने पुढाकार घेतला (असून, त्यावर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. काही ठिकाणी संघाने यादृष्टीने प्रयोगदेखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक स्तरापासूनच मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे. इंग्रजीचा प्रसार वाढत असताना मातृभाषेचे महत्त्व किती आहे, यावर मंथन होणार आहे. यासोबतच २१ जून हा संयुक्त राष्ट्रसभेतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. याच्या प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने तिसरा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे वैद्य म्हणाले़ प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल, अशी माहिती वैद्य यांनी दिली. (प्रतिनिधी)> काश्मीर मुद्यावर मौन‘पीडीपी’सोबत हातमिळवणी करुन सत्तास्थापनेनंतर भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. ३७० कलम रद्द करणे हा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर आहे. परंतु आता भाजपाला यावर ठोस भूमिका घेणे अवघड जाणार आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे. या प्रतिनिधी सभेत मात्र यावर चिंतन होणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.