मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेला अमानुष अत्याचार व खूनाच्या घटनेवरून विरोधी पक्षनेत्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कायदा व सुव्यवस्था उरलेली नसून महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला. विधानसभेत चर्चेला सुरुवात करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले, तुमचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. नव्याने सरकारात सामील झालेल्या मंत्र्यांना त्यांचे खाजगी सचिव नेमण्यासाठी देखील आपली परवानगी लागत आहे, तुमचा तुमच्या सहकारी मंत्र्यांवर देखील विश्वास नाही का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.कोपर्डी प्रकरणातील आरोपींपैकी बबलू शिंदेने १६ डिसेंबर २०१५ रोजी एक खून केला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली असती तर आज ही वेळच आली नसती. मात्र त्यावेळी तो खून आकस्मित मृत्यू म्हणून नोंदवला गेला. त्यानंतरही या आरोपींनी बेकायदशीर हातभट्टीची दारु पिऊन कोपर्डीतील घटना घडवली. जर पोलिसांनी दारु अड्डे बंद पाडले असते तरीही ही घटना घडली नसती. मात्र पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष या सगळ्या प्रकाराला कारणीभूत आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. मंत्रालयातील महिला अधिकारी सुरक्षित नाहीत.कारण त्यांच्यावर अन्याय करणारे मोकाट फिरत आहेत. गणेश पांडेला कधी अटक करणार? तो कोणत्या पक्षाचा आहे हे पाहून कारवाई करु नका, असा चिमटाही पवारांनी काढला.हे तर ओव्हरटाईम गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओव्हरटाईम गृहमंत्री आहेत, त्यांना अनेक कामे आहेत तरीही ते गृहमंत्रीपद का सोडत नाहीत, असा सवाल करत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. कोपर्डी मधील घटनेची जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.कोपर्डीची घटना १३ तारखेला रात्री ७ च्या आसपास घडली. मात्र त्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे तिकडे फिरकले नाहीत. महिला पोलीस अधिकारी तिकडे गेल्या नाहीत, राज्याच्या पोलीस महासंचालकांना तिकडे जावेसे वाटले नाही, मुख्यमंत्री फिरकले नाहीत, यातून तुम्ही कशी संवेदनशिलता दाखवणार? असा सवाल विखेपाटील यांनी केला. अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जसे संरक्षण दिले जाते तसेच गुन्हे बलात्कार करणाऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यासाठी कायदा करा, अशी मागणीही विखे यांनी यावेळी केली.विधान परिषदेत चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. निवडणूकीपूर्वी वाघाच्या जबड्यात हात घालायच्या बाता मारणा-यांनी आरोपीचा हात पकडून दाखवायची हिंमत दाखवावी, असे आव्हान मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. राज्यात महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये एवढी वाढ झाली आहे त्यामुळे आरक्षण नसले तरी चालेल पण संरक्षण द्या, असे म्हणायची वेळ महिलांवर आली आहे, असाही टोलाही त्यांनी हाणला.कोपर्डी येथील दुर्घटनेनंतर कुटुंबियांची फिर्याद नोंदवायला दोन दिवस का लागले. तेथील पोलिस अधिका-यांनी फिर्यादींना क्रॉस कम्पलेण्टची भीती घातल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. या घटनेतील आरोपीचा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांंच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली. हीच तत्परता त्यांनी नगरला भेट देण्यात का दाखवली नाही. राम शिंदे यांना क्लीन चीट देताना मुख्यमंत्र्यांनी आरोपीचा फोटो जाहीर करून इव्हिडन्स अॅक्टचा भंग केल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. आरोपीची ओळख परेड झालेली नसताना आरोपीचा फोटो कसा काय दाखवला, असेही ते म्हणाले. यावेळी प्रवीण दरेकर, भाई जगताप, नीलम गो-हे, जोगेंद्र कवाडे आदी सदस्यांची भाषणे झाली. चर्चा अर्धवट राहिली असून बुधवारी सभागृहाच्या विशेष बैठकीत उर्वरित सदस्यांच्या भाषणांनंतर सरकार पक्षाकडून उत्तर अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)>दाऊद, गुंड आणि भाजपानागपूर, जळगावसह राज्यातील सर्व गुंड सध्या भाजपात सामील झाले आहे. अनेकजण तर पदाधिकारी बनले आहेत.गुंड, दलालांनीच भाजपात प्रवेश केल्यावर आता कायदा सुव्यवस्था कशी सुधारणार? २६ गुन्हे असणा-या मुन्ना यादवची महामंडळावर वर्णी लावण्यात आली. उद्या दाऊद शरणागती पत्करुन भारतात आल्यास त्यालाही भाजपात घेतील. कदाचित त्याला मंत्रीपदही दिले जाईल, असा चिमटा राणेंनी काढला. >राज्यात तीन मुख्यमंत्री! : राज्यात सध्या तीन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. एक देवेंद्र फडणवीस, दुसरे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, तर तिसऱ्याचे नाव लवकरच जाहीर करू, असा आरोप राणे यांनी केला. मुंबई-पुण्यातील कार्पोरेट आॅफीसमधून परदेशी कारभार बघतात, असेही राणे म्हणाले.>आता फडणवीसांवर कोणता गुन्हा ? राणे म्हणाले, विरोधी बाकांवर असताना हेच फडणवीस बलात्कार व आत्महत्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत. मग, आता फडणवीसांवर कोणता गुन्हा नोंदवायचा? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहखाते समजलेलेच नाही. वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या २० हजारांवर गेली असून गुन्ह्यांची नोंद न करण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्याचा आरोप राणे यांनी केला.
विरोधकांचा हल्लाबोल
By admin | Updated: July 20, 2016 05:00 IST