ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - लोकलला होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेवर पडणारा ताण आणि त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने अखेर त्याची गंभीर दखल रेल्वेकडून घेण्यात आली आहे. लोकलवर येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईतील कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी अभ्यासगट समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. सह्याद्री अतिथिगृह येथे रविवारी चिपळूण ते कराड रेल्वे मार्गाच्या कामासाठी कोकण रेल्वे व शापूरजी पालनजी कंपनीत सामंजस्य करार केला गेला. त्यावेळी प्रभू बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व अन्य मंत्री तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रभू यापुढे म्हणाले की,मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज ८0 लाख प्रवासी प्रवास करत असून वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले नाही. रेल्वेवरील भार उचलण्यासाठी मेट्रोचे जाळे हे १५ ते २0 वर्षांपूर्वीच उभारण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे लोकलवरील येणारा गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यात कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असून त्यासाठी अभ्यास गटाची स्थापन करण्यात येईल. त्यांच्या अभ्यासानंतर पुढील योग्य निर्णय घेतला जाईल. त्यासाठी खाजगी क्षेत्रानही मदत करावी, असे आवाहन केले. चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाविषयी त्यांनी सांगितले की,या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील विकासाची दरी मिटणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास विकासाची गती वाढण्यास मदत मिळेल. रेल्वे मार्गाने बदंरणे जोडण्याबरोबरच विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुंबईत एक लाख कोटींचे मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जागतिक बँकेची मदत घेताना रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फंड उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभू यांनी यावेळी दिली. सामंजस्य करारावर सह्याकोकण रेल्वे व शापूरजी पालनजी यांच्यात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी परस्पर सामंजस्य करारावर सह्या झाल्या. यावेळी कोकण रेल्वे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. - प्रकल्पाची किंमत ३१९५.६0 कोटी- १0३ किमी प्रकल्पाची लांबी- ५८ पुल, १६ मोठे बोगदे, ८ किमीचा मोठा बोगदा- विहळे, मुंढे, कोयना रोड, पाठण, शेडगेवाडी आणि खोडाशी या सहा रेल्वे स्थानकांचाही समावेश. - सातारा ६६ किमी तर रत्नागिरीचा ३७ किमीच्या भागाशी संपर्क- प्रकल्पात वृक्षतोड टळणाररेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या दोन वर्षात लोकलची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा वारंवार केली. मात्र त्यावर ठोस निर्णय झाला नाही. पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांनी ही घोषणा केल्याने कार्यालयीन वेळेत बदल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.