परिवहन प्राधिकरणाने ठरवले दरपत्रक : १ ते २५ कि.मी.पर्यंत ४०० रुपये
सुमेध वाघमारे - नागपूर
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर अॅम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे, मात्र शहरात याला ‘कमर्शियल’ सेवेचे स्वरूप देऊन खुलेआम लुट सुरू होती. गरीब आणि गरजू नागरिकांना गंभीर रुग्ण इस्पितळात घेऊन जाण्यासाठी किंवा मृतदेह रुग्णालयातून घरी नेणे जिकरीचे झाले होते. अॅम्ब्युलन्स चालकांवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने हा गोरखधंदा जोरात सुरू होता, अखेर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने यात लक्ष घालून रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरविले आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मारुती रुग्णवाहिकेच्या पहिल्या २५ कि.मी. पर्यंत ४०० रुपये दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेच्या नावावर सुरू करण्यात आलेला अॅम्ब्युलन्सचा धंदा शहरात इतर व्यवसायाप्रमाणेच बहरत चालला होता. अमर्याद कमाईमुळे अनेकजण या व्यवसायाकडे आकर्षित झाले होते. सर्वसाधारण चालकापासून भंगारवाल्यांपर्यंत, तसेच विविध पक्ष, संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धंद्यात शिरकाव केला होता. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणार्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण झाले होते, परिणामी गरीब व गरजूंकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात होती. अॅम्ब्युलन्स चालक ५० कि.मी.अंतरावरील गावात जाण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारत होते. अॅम्ब्युलन्स चालकाचे दर निश्चित नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागयचा. काही तर अॅडव्हान्स पेमेंट घेऊन अॅम्ब्युलन्समध्ये डिझेल भरून येतो, असे सांगून पसार होण्याच्या घटनाही वाढल्या होत्या.
अखेर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नागपूरने याची दखल घेतली. रुग्णवाहिकेचे दरपत्रक ठरवून दिले. शहराच्या हद्दीमध्ये पहिल्या २५ कि.मी.पर्यंत रुग्णवाहिका मारुती असेल तर ४०० रुपये, टाटा सुमोला ४५० रुपये, विंगरला ५०० तर टेम्पो ट्रॅव्हलरला ६०० रुपये दर ठरविले. वातानुकूलित यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमूद दरात १० टक्के वाढ करून दिली. महापालिकेच्या आत व हद्दीबाहेर २५ कि.मी. नंतरच्या प्रत्येक कि.मी. करिता रुग्णवाहिका मारुतीला नऊ, टाटा सुमोला दहा, विंगरला अकरा तर टेम्पो ट्रॅव्हलर तेरा रुपये दर ठरविण्यात आले आहेत.
अॅम्ब्युलन्सचा गैरफायदाच अधिक आरोग्य सेवेत अॅम्ब्युलन्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्यसरकारने अॅम्ब्युलन्सला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे. रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहचता यावे यासाठी अॅम्ब्युलन्सला सायरन वाजविण्याची मुभाही देण्यात आली आहे. रुग्ण घेऊन जाताना जांभळ्या काचेमध्ये लुकलुकणारा लाल दिवा दिला आहे. वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नाही. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नाही. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या आहेत, मात्र याचा शहरात अनेक अॅम्बुलन्सचालक गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. गंभीर रुग्णांवर असतो ‘वॉच’ मेयो, मेडिकल रुग्णालयाच्या कोणत्या वॉर्डात रुग्ण गंभीर आहे याच्या शोधात नेहमीच अॅम्बुलन्सचालक असतात. यासाठी रुग्णालयातील काही कर्मचारीही त्यांना मदत करतात. अशा रुग्णाच्या नातेवाईकाशी जवळीक साधण्याचे ते प्रयत्न करीत असतात. रुग्णाचा मृत्यू होताच माफक दरात गावाला घेऊन जाण्याच्या नावाखाली काही चालक मनमानीपणे पैशाची वसुली करतात.