नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी दि.१९ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले