लोकसभा निवडणूक : अंतिम हिशेब सादरनागपूर : लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केलेला खर्च पाहता तो अवाढव्य असला तरी उमेदवारांनी आयोगाकडे सादर केलेल्या खर्चाच्या विवरणात मात्र तो आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेत आहे. .लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली होती. ती सर्वांनी पाळल्याचे खर्चाच्या विवरणावरून दिसून येते.निवडणुकीच्या वेळी झालेल्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभा, मिरवणुका आणि इतरही सभा तसेच निवडणुकीच्या काळातच करावा लागणारा ‘इतर’खर्च लक्षात घेता प्रमुख राजकीय पक्षांकडून करण्यात आलेला खर्च हा अवाढव्य स्वरुपाचा होता. त्यातून केंव्हाच खर्चमर्यादा ओलांडली गेली होती. परंतु कागदोपत्री मात्र त्यांनी ती मर्यादेतच दाखविली. उलट ती त्याही पेक्षा कमी दाखवली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षाकडे खर्च सादर करण्याची शेवटची तारीख ही १५ जून होती. या काळात नागपूर लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवार वगळता इतर ३० उमेदवारांनी खर्चाचे विवरण सादर केले आहे. ते सर्व आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादेच्या खाली आहे. एकाही उमेदवाराने ७० लाख ही मर्यादा ओलांडली नाही. तीन उमेदवारांनी त्यांच्या खर्चाचे विवरण सादर केले नाही. त्यात जावेद अन्सारी, राममूर्ती चिमोटे आणि बशीर खान यांचा समावेश आहे..त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी भाजपचे नितीन गडकरी यांनी ४० लाख २६ हजार ७९, बसपाचे मोहन गायकवाड यांनी २८,४३,५०६, काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी ५५ लाख ३३ हजार ९०७ तर आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी ३९ लाख७१ हजार ६०२ रुपये खर्च केले आहेत. यंदा प्रथमच उमेदवारांच्या खर्चावर आयोगाने कटाक्षाने लक्ष दिले. नागपूरात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. खर्चाचे विवरण कसे सादर करायचे यापासून तर इतरही तांत्रिक बाबींची माहिती या कक्षातून उमेदवारांना देण्यात आल्याने सोयीचे ठरले.(प्रतिनिधी)
सर्वच उमेदवारांचे खर्च आयोगाच्या मर्यादेत
By admin | Updated: June 17, 2014 00:47 IST