मुंबई : आरे कॉलनीच्या जमिनीवर मेट्रोचे कारशेड व अन्य शासकीय प्रकल्प वगळता सरसकट बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले. बृहन्मुंबईचा विकास आराखडा २०१५च्या वर्षअखेरपर्यंत अंतिम व्हावा, अशी आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आरेच्या जमिनीवर सरकारी व महापालिकेचे विकासाचे प्रस्ताव गुणवत्तेच्या निकषात बसत असतील तर अमलात आणले जातील. महापालिकेने तयार केलेला हा प्रस्तावित विकास आराखडा अंतिम नाही. यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील. त्याची सुनावणी करण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती असेल. त्यांनी घेतलेला निर्णय महापालिका सभागृहापुढे जाईल व मंजूर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकारची छाननी समिती तो विकास आराखडा तपासून मुख्यमंत्री या नात्याने अंतिम मंजुरीकरिता आपल्याकडे पाठवेल. ही प्रक्रिया वर्षअखेरपर्यंत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे. सध्या बृहन्मुंबईत वेगवेगळ््या विकास नियंत्रण नियमावली अमलात आणली जाते. पर्यावरण विभागाबरोबर सल्लामसलत करून एकच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याचे निर्देश महापालिकेला दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.राज्याचे गृहनिर्माण धोरण ‘यशदा’ला तयार करण्यास सांगितले आहे. त्यावर सर्व विभागांचे अभिप्राय घेतले जातील. राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण धोरण मंजूर झाल्यावर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संपूर्ण राज्याकरिता एकच विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) धोरण अमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु बृहन्मुंबई व अन्य शहरे यांच्यातील परिस्थितीत फरक असल्याचे फडणवीस यांनी कबुल केले. (विशेष प्रतिनिधी)
आरे कॉलनीत सरसकट बांधकाम होणार नाही
By admin | Updated: February 26, 2015 02:53 IST