अहमदपूर : नागपूर - रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ अहमदपूर शहराजवळून जात असून, शहरानजीक बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गुत्तेदाराने सुरुवात केली असता, मावेजासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी हे काम बंद पाडले. यात महिलांचाही सहभाग होता.
नागपूर - रत्नागिरी महामार्गासाठी जवळपास १५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना जमिनीच्या मावेजापोटी उपजिल्हाधिकाऱ्यांनी खरेदी खताच्या आधारे सरासरी २ हजार ९०२ रूपये प्रति चौ. मी. भाव निश्चित केला असता, त्यावर महामार्ग प्राधिकरणने आक्षेप घेतला. त्यामुळे हे प्रकरण लवादाकडे गेले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाने दोन्ही बाजूच्या पुराव्यांचा अभ्यास न करता वेळकाढू भूमिका घेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून केवळ ६७९ रुपये प्रति चौ. मी.प्रमाणे दर निश्चित करून घोर निराशा केली असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अपिलामध्ये मंजूर केलेला ६७९ रुपये प्रति चौ. मी. दर खूपच कमी आहे.
हा दर आम्हाला मंजूर नाही. चुकीचा निकष लावून हा दर देण्यात आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षाही कमी दर देण्यात आलेला आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२०च्या निकालाचा फेरविचार करून समृद्धी महामार्गाप्रमाणे मावेजा देण्याची मागणी करण्यात आली. या निकालाचा फेरविचार न झाल्यास महामार्गाचे काम संबंधित शेतकरी होऊ देणार नाहीत, असे म्हणत बुधवारी काम बंद ठेवले.
या आंदोलनात शेतकरी प्रा. गोविंदराव शेळके, शाम भगत, बालाजी बोबडे, गोविंद भगत, सरपंच गोपाळ पाटील, बाबुराव भगत, विकास बोबडे, संजय बोबडे, संग्राम भगत, नामदेव सातापुरे, ॲड. सादिक शेख, माऊली बडगीरे, अनिल फुलारी, विजय पाटील, दिनेश भगत, ईस्माईल शेख, महेश पाटील, चैतन्य बोबडे, पंढरी बिलापट्टे, महेश बिलापट्टे, नंदू भगनुरे, मुस्ताक बक्षी, हर्षद बोबडे, गजानन हाडोळे, रमाकांत चेवले, लक्ष्मण चेवले, भानुदास भगत, बाबुराव बिलापट्टे, माऊली बिलापट्टे, धर्मराज चावरे, वसंत डावरे, सुमनबाई शेळके, पार्वतीबाई साळुंके, लक्ष्मीबाई भगत, प्रतिभा बोबडे, चंद्रकला भगत, सुंदरबाई भगत, रंजना भगत, लिंबाबाई भगत, अनुसया भगत आदी सहभागी झाले होते.
सक्षम अधिकारी अनुपस्थित...
या आंदोलनावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा सक्षम अधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक असताना केवळ सेवानिवृत्त कर्मचारी जीवन बोडगे, हरिओम सिंग, रामचंद्र वाकड, बालाजी हिप्परगे हे उपस्थित होते.
महामार्गाचे काम थांबू नये...
लवादाने दिलेल्या निर्णयाला न्याय प्रक्रियेत आव्हान दिले असून, न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम थांबवू नये, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जीवन देसाई यांनी केले.
चोख पोलीस बंदोबस्त...
पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, हेडकाॅन्स्टेबल एस. डी. भिसे, पोलीस नाईक अभिजित लोखंडे, हेडकाॅन्स्टेबल बेल्लाळे, एएसआय आलापुरे आदींनी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.