लातूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर रोटरीच्या निरनिराळ्या संस्थांमार्फत देवाण-घेवाण, गरजूंना मदत होत असते. जगातील लोक एकोप्याने राहावेत, अपसामध्ये सामंजस्य असावे अशीच भावना रोटरीच्या कार्यातून बघायला मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांच्या विभागाचे लातूरचे नूतन गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या पदग्रहण संभारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते. मंचावर डॉ. महेश कोटबागी, मोटवानी, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, लातूरचे नूतन गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, ॲड. सविता मोतीपवळे उपस्थित होते.
शिवराज पाटील चाकूरकर यांचे डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी स्वागत केले. चाकूरकर म्हणाले, सर्व माणसे सारखी आहेत, त्यांच्याकडे समान भावनेने बघणे ही भावना रोटरीच्या कार्यातून बघायला मिळते, व्यक्तीला व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून समाजात वावरावे लागते. त्यातील वैज्ञानिकता समजून घेऊन व त्याचा उपयोग करून नवीन दृष्टिकोन ठेवून वावरावे लागते, त्याचबरोबर त्याला अध्यात्माची जोड मिळाली तर त्याचे स्वतःचे जीवन तर सुखी होतेच, परंतु इतरांचे, पर्यायाने समाजजीवन सुखी होण्यासाठी साह्य होते, असेही ते म्हणाले़
या प्रसंगी आपल्या भाषणातून लातूर रोटरी गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीच्या गव्हर्नरपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व रोटरियन्सचे आभार मानले व या पदग्रहण कार्यक्रमाला डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, अड. सांबप्पा गिरवलकर, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, ॲड. व्यंकटराव बेद्रे, प्रा. मोतीपवळे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, चंद्रशेखर पाटील, विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनी, धनश्री केळकर यांनी केले. आभार मेहूल कामदार यांनी मानले. प्रास्ताविक संजय बोरा यांनी केले. या वेळी शशिकांत मोरलावार, माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी, प्रमोद पारीख, रवींद्रदादा साळुंके, व्यंकटेश चन्ना, शिरीष रायते, डॉ. दीपक पोफळे, झुबीन अमेरिया, आप्पासाहेब पाटील उपस्थित होते.