जळकोट तालुक्यातील घोणसी परिसरातील तिरुका, अतनूर, चिंचोली, माळहिप्परगा या माळरानावर वन विभागाच्या वतीने विविध रोपांची लागवड करण्यात आली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने माळरानावरील रोपे पाण्याअभावी वाळण्याची भीती आहे. त्यामुळे रोपांच्या संवर्धनासाठी वन विभागाच्या वतीने टँकरद्वारे पाणी देऊन रोपे जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच वन विभागाच्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकले जात आहे. त्यामुळे वन्यजीवांची तहान भागण्यास मदत होत आहे.
पाणवठ्यावर पशू-पक्षी येत असल्याने किलबिलाट ऐकावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत वन विभागाने वन्यजीवांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध केल्याने पर्यावरणप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. सांगुुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जे. बी. काळे, वनरक्षक व्ही.डी. सुरेवाड, वनसेवक तातेराव बिरादार, अहमद मुंजेवार व वनमजूर काम करीत आहेत.