लोकमत न्यूज नेटवर्क
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावाजवळून वाहणाऱ्या तिरू नदीपात्रात झुडपे वाढली आहेत. त्याचबराेबर नदीवरील पुलावरही झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. संबंधित विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हाळी हंडरगुळी गावाजवळून तिरू नदी वाहते. पुढे ती चिमाचीवाडी येथे असलेल्या तिरू प्रकल्पाला जाऊन मिळते. या नदीचा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होत असून, सिंचनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत झाली आहे. हाळी गावाजवळून वाहणाऱ्या या नदीवर वाहतुकीच्या सोयीसाठी निजाम काळात बांधलेला पूल आजही तग धरून आहे.
१० वर्षांपूर्वी या पुलाची एक बाजू वाढविण्यात आली. मात्र, जुन्या बाजूवर मागील काही वर्षांपासून लिंब, पिंपळ, वड, बोर आदी झुडपे वाढली होती. त्याची वेळेत दखल न घेतल्याने आज त्या झुडपांचे झाडात रूपांतर होत आहे. त्यामुळे झुडुपांची मुळे खोलवर जाऊन पुलाला तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीच्या पुलावरून नांदेड - बिदर राज्यमार्ग असल्याने एस. टी. बसेस, ट्रक, अवजड वाहने, मालवाहतुकीची वाहने, चारचाकी, दुचाकी आदी वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय, हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते. संबंधित विभागाने पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.