औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात चार दिवसांपासून सतत हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. तसेच बाजारपेठेत दरही घसरल्याने चिंता वाढली आहे.
औराद शहाजानी कृषी मंडळात यंदा जवळपास ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर साेयाबीनचा पेरा झाला आहे. दोन टप्प्यांत पेरणी झाली. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने पिकांची शाकीय वाढ व्यवस्थित झाली नाही. त्यानंतर पाऊस सुरू होऊन अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत असताना चार दिवसांपासून सतत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. गुरुवारी दिवसभर झडीचा पाऊस होता. या पावसामुळे उभ्या सोयाबीनला शेंगा फुटत आहेत. त्यामुळे हाता- तोंडाशी आलेले पीक निसर्गामुळे हिरावले जात आहे.
दरम्यान, बाजारपेठेत ११ हजारांपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर चार दिवसांत एकदम कोसळले आहेत. ४ हजार ६०० ते ६ हजारांच्या दरम्यान दर आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाने उघडीप दिल्यास सोयाबीनचे होणारे नुकसान टळणार आहे.
दरम्यान, औराद परिसरातील मांजरा व तेरणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे, परिसरातील लहान-मोठे लघू तलाव पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी ओढा, नाल्याने नदी पात्रात वाहत येत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तेरणा नदीवरील औरादसह इतर बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. दाेन्ही नद्यांचे पाणी संगमावर पसरले आहे. गुरुवारी रात्री पुन्हा जाेरदार पाऊस झाला असून, येथील हवामान केंद्रावर ६० मिमी पावसाची नाेंद झाली आहे.
सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. महिना अखेरीस कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेऊन पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकीकडे साेयाबीन दर घसरले आहेत तर दुसरीकडे हाता-तोंडाशी आलेले पीक पाऊस काढू देत नाही.
उतारा ५० टक्क्यांनी घटला...
मी बागायतदार शेतकरी हाेताे. सततच्या कमी-जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बागायती क्षेत्र मोडून आठ बॅग साेयाबीनची पेरणी केली. ऐन फळधारणेच्या कालावधीत पावसाने उघडीप दिली. आता काढणीवेळी सतत पाऊस होत आहे. त्यामुळे यंदा उतारा ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत राहणार आहे. पावसाने उघडीप दिली तर त्याची तूट भावात भरून निघेल, अशी अपेक्षा हाेती. परंतु, दर घसरल्याने संकट निर्माण झाले आहे. तसेच दाेन एकरवर टोमॅटो होते. परंतु, बाजारात भाव मिळाला नाही. त्याचा उताराही ४० टक्क्यांनी घटला आहे.
- ओमकार मरगणे, शेतकरी.