रिंगरोड परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:33+5:302021-05-10T04:19:33+5:30
बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची ...
बार्शी रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौक ते महिला तंत्रनिकेतन मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच या मार्गावर विद्यार्थी प्रवास करतात. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे तसेच पाच नंबर चौक ते शहरातील मुख्य चौकापर्यंत जागोजागी गतिरोधक बसविण्याची गरज आहे. अनेक वाहने भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे अपघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त
लातूर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. हवामानात बदल झाल्याने दोन दिवसांपासून वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच नागरिकांना विजेच्या लपंडावामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ‘महावितरण’ला वेळोवेळी सूचना करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. समस्या दूर करण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
लातूर : सध्या शाळांना सुट्या लागल्या असून, कोरोनामुळे शाळांचे वर्ग भरलेच नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे तसेच ताणतणाव कमी व्हावा, यासाठी विविध शाळांच्यावतीने ऑनलाईन चर्चासत्र, व्याख्याने आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अनेक विद्यार्थीही त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दरम्यान, या उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजनाचा उपक्रम
लातूर : शहरातील प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच पोलीस बांधवांना नाष्टा वितरीत केला जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोफत भोजनाचा उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान, शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, विविध कोविड केअर सेंटरमध्ये मोफत भोजन दिले जात असल्याचे प्रभुराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. अजय कलशेट्टी म्हणाले.