रेणापूर तालुक्यात ५४ हजार हेक्टर क्षेत्र असून, यापैकी ४८ हजार ७०० हेक्टर हे पेरणीयोग्य आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे ५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. त्यामुळे प्रत्यक्षात ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. पेरणीसाठी लागणारे साहित्य व खत, बी-बियाणे घेऊन शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. तालुक्यातील रेणापूर, पानगाव, कारेपूर, पळशी, पोहरेगाव या पाच मंडळांमध्ये आतापर्यंत ३०१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात रेणापूर महसूल मंडळांमध्ये ६८ मिलिमीटर, कारेपूर महसूल मंडळांमध्ये ७० मिलिमीटर, पळशी महसूल मंडळांमध्ये ६८ मिलिमीटर, पोहरेगाव महसूल मंडळांमध्ये ६४ मिलिमीटर तर सर्वाधिक कमी पानगाव महसूल मंडळांमध्ये फक्त ३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकूण सरासरी तालुक्यामध्ये ६०.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पेरणीसाठी मोसमी ७५ ते १०० मिलिमीटर पावसाची आवश्यकता लागते.
७५ ते १०० मि.मी. पावसानंतरच पेरणी करावी...
रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमीत कमी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरीराम नागरगोजे यांनी केले आहे.