येरोळ : आधुनिकतेची कास धरत शेतकरी आपल्या शेतात विविध नाविण्यपूर्ण प्रयोग राबवितात. मात्र, शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतक-यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. येथील युवा शेतकरी पाशा गफुरसाब कोतवाल यांनी उत्पनाच्या आशेवर पपईची लागवड केली. परंतु व्यापारी तीन ते चार रुपये किलो दराने पपई मागत असल्याने तोडणीव मजुरीचा खर्च निघत नाही. परिणामी, पपई झाडावरच खराब होत आहे. परिणामी, पपई उत्पादक संकटात सापडले आहे.
येरोळ येथील शेतकरी पाशा गफुरसाब कोतवाल यांनी दोन एकर शेतीमध्ये ऑक्टाेबर महिन्यात पपईचे दिड हजार झाड लावले होते. यासाठी त्यांना शेणखत, लिक्विड खत, मिक्स डोस, मल्चिंग पेपर, फवारणी, जमीनीची मशागत, मजुरी असा १ लाख ६० हजार रुपयाचा खर्च आला होता. यामध्ये खर्च जाता अडीच ते तीन लाख रुपयाचे उत्पन्न होईल, असा त्यांनी अंदाज बांधला होता. परंतु अचानक पपईचे मार्केट पडले. पपईचा भाव तीन ते चार रुपये प्रति किलो झाला. आता मिळेल त्या भावात पपई विकून पैसे मोकळे व्हावे, म्हणुन पाशा कोतवाल यांनी अनेक व्यापा-यांना संपर्क साधला पण कुणीही शेतात येऊन माल घ्यायला तयार नाही. लातुर, उदगीर येथील मार्केटला जाऊन तीन-चार रुपये किलो प्रमाणे पपई विकल्यास वाहतूक खर्चातच जास्त पैसे जाणार असल्याने पपई उत्पादक शेतकरी कोतवाल हतबल झाले आहेत.
खर्चही निघणे झाले अवघड...
गेल्या दाेन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यातच शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. या सर्व संकटावर मात करीत शेतकरी विविध नाविण्यपूर्ण प्रयोग करीत असले तरी भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. पिकांवर केलेला खर्चही निघेने अवघड झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. दरम्यान, शासनाने नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करण्याची मागणी होत आहे.