खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, तर त्याच्या विम्याचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध बँका, महा ई सेवा केंद्र येथे पीक विम्याचा भरणा केला होता. जून महिन्यात वेळेवर पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर झाल्या. यामध्ये एकंदर लागवड क्षेत्राच्या २३ हजार ७०० हेक्टर्समध्ये सोयाबीनचा पेरा करण्यात आला, तर उर्वरित तूर, उडीद, मूग अशी पिके घेण्यात आली आहेत. पेरणीनंतर कित्येक दिवस पावसाने पाठ फिरवली. माळरानावरील पिके करपून गेली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. मागील महिन्यात तर मुसळधार पाऊस पडून अनेकांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले. नदीकाठच्या जमिनीत पाणी घुसून उभी पिके पाण्यात गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनीकडे ऑनलाईन नोदणी करून देण्यात यावी. असे आवाहन विमा कंपनीकडून करण्यात आले. पण ऑनलाईन नोंदणीत अडथळ्याची शर्यत पार करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यानी ऑफलाईन अर्ज दाखल करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ऑनलाईन नोंदणीस अडथळ्याची शर्यत...
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करून माहिती द्यावी, असे आवाहन विमा कंपनीकडून करण्यात आले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल फोनची सुविधा नाही, तर ज्यांच्याकडे मोबाईल फोनची सुविधा आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती, तर ओटीपी येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. म्हणून तालुक्यातील १ हजार ५००पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात ऑफलाईन अर्ज दाखल केले आहेत.
सरसकट पंचनाम्याची मागणी...
येथील भाजपा तालुका शाखेचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह सरसकट पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार अतुल जटाळे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.