नागरी सुविधा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या मांडण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, तिथे सरपंच, उपसरपंच अथवा ग्रामविकास अधिकारी नसल्याने पाणी नाही पिण्याला अन् ग्रामपंचायत कशाला, असा सवाल व्यक्त केला.
चाकूर तालुक्यातील चापोली ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गतच्या शंकरवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी १२ महिने भटकंती करावी लागते. सध्या उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाहीत. विद्युत पथदिवे नाहीत यासह अन्य मूलभूत समस्या आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. घरकुल व विहीर योजनेसाठी दुर्लक्ष केले जाते. गावामध्ये स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबल्या आहेत. साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दक्षता घेतली जात नाही.
सध्या येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नाही. येथील नागरी समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप केला. ग्रामपंचायतीने नागरी सुविधा व अडचणी न सोडविल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यावर महानंदा कासले, छाया पस्तापुरे, कांताबाई कांबळे, पार्वती चिमले, लक्ष्मीबाई कांबळे, सखुबाई चिमले, वंदना रामासाने, सुमन चिमले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लवकर समस्या सोडविल्या जातील...
शंकरवाडी येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य नागरी सुविधांबाबत निवेदन दिले आहेत. लवकर त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांनी सांगितले.